हिंदूंची मंदिरे का तोडली जातात ? कारणे व उपाय

मंदिरे ही हिंदूंची अस्मिता आहे आणि या अस्मितेला कोणत्याही प्रकारचा धक्का बसला की निश्चितच आपल्याला त्याचा राग येतो. बऱ्याचदा हिंदूंच्याच चुकीमुळे अनेक वेळा प्राचीन मंदिरेही महानगरपालिका / सरकार / विकासकाकडून तोडली जातात. आपल्या शेजारील, विभागातील एखाद्या मंदिराला नोटीस आली की मग आपली धावपळ सुरू होते, आणि हाती निराशा येते. या विषयाबाबत भरपूर दिवस अभ्यास करत होतो त्यानुसार या लेखात काही कारणे सांगणार आहे आणि त्यावर उपायही सांगणार आहे ... तेंव्हा लेख पूर्ण वाचा. आपल्या विभागातील जुन्या मंदिरांना नोटिस का येतात त्याची कारणे -- प्रथमतः मंदिर आणि घर यात फार मोठा फरक असतो. काही चांगले सज्जन, धार्मिक लोक आपल्या घरात /घराजवळ एखाद्या जागेत /एखाद्या पवित्र ठिकाणी /झाडाखाली एखादया प्राचीन मूर्तीची स्थापना करतात. आणि मग त्या देवांची तिथे पूजा अर्चा करतात. आता निश्चित अशा प्रकारे स्थापना करणारे जे धार्मिक घराणं आहेत त्या काळात मंदिराबाबत कोणतीही कागदपत्रे ठेवत नाहीत, त्यांच्यासमोर तसा प्रश्न उद्भवत नाही. मग त्यांची हयात संपली की त्यांच्या पुढील पिढीस ते सर्व हस्तांतरित करतात. ...